📍मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांना शेतकऱ्यांच्या पीककर्ज वितरणाबाबत महत्त्वाचे आणि कडक निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना सीबिल स्कोरची अट लावू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री यांनी दिले.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असून, अनेक शेतकरी सीबिल स्कोरच्या अडचणीमुळे कर्जापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये. बँकांनी सकारात्मक भूमिका घेत पीककर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी.”
यावेळी मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी योजनेबाबतही महत्त्वाची माहिती दिली. “राज्यातील सर्व बँकांसोबत कर्जमाफी संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये आणि कोणत्या पद्धतीने सादर करायची यावरही चर्चा पूर्ण झाली आहे. वेळेत कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी बियाणे, खत, वीज आणि कर्जपुरवठा याबाबत सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या या निर्देशामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पीककर्ज वितरणाचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
— ज्ञानगंगा न्यूज
🌐 Dnyangangaa.com
