
संगमनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख असलेल्या तमाशा लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि या कलेला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या संगमनेरच्या सुपुत्र रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या गौरवामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेत रघुवीर खेडकर यांनी तमाशा लोककलेत नवे प्रयोग केले. पारंपरिक तमाशाला आधुनिक रंगमंचावर सादर करत त्यांनी ग्रामीण संस्कृतीचा आवाज देशभर पोहोचवला. तमाशा ही केवळ करमणूक नसून ग्रामीण जीवनशैली, संघर्ष आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले.
लोककलेच्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून तरुण पिढीला तमाशाकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे तमाशा कला नव्या पिढीपर्यंत पोहोचली असून लोककलेला नवसंजीवनी मिळाली आहे.

रघुवीर खेडकर यांना जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल संगमनेरमधील नागरिक, कलाकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली जात आहे
